औरंगाबाद: कार्तिकची विकलांगतेवर मात; पायाने लिहितो…खातो…पितो

औरंगाबाद: कार्तिकची विकलांगतेवर मात; पायाने लिहितो…खातो…पितो

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जन्मत:च दोन्ही हात नाही म्हणून त्याने हार मानली नाही. हात नसले तरी गळ्यात छडी धरून फळ्यावरील वाचतो. पायानेच लिहतो, खातो, पितो इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे आपले जीवन जगतो. आपल्यात काही कमी आहे, याचा न्यूनगंड त्याच्यामध्ये नाही. जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी कार्तिक मोरे आपली सर्व कामे स्वत: करतो. स्वत:वरील आत्मविश्वास व शिक्षकांकडून मिळालेली प्रेरणा यामुळे विकलांगतेवर मात करत तो स्वावलंबी जीवन जगत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चापानेर केंद्र असलेल्या पळसगावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात कार्तिक मोरे शिकत आहे. कार्तिकचे आई- वडील मजुरी करतात. कार्तिकला जन्मत:च खांद्यापासून दोन्ही हात नाहीत. त्याला दोन्ही हात नाही मग तो कसा शिक्षण घेणार.. कसा लिहणार असे प्रश्न कार्तिकच्या आई वडिलांसमोर होते. त्यामुळे त्यांनी त्याला शाळेत पाठवायचेच नाही असे ठरवले. मात्र, शाळेतील शिक्षकांनी त्याला शाळेत पाठवा, तो हुशार आहे तो शिकेल, शिकला तर त्याचे भविष्य चांगले होईल, अशी त्याच्या पालकांची मनधरणी करत कार्तिकला पहिलीच्या वर्गात दाखल करून घेतले.

कार्तिक जिद्दी असल्याने त्याने विकलांगतेवर मात केली. शाळेत छडी खांदा व मानेच्या मध्ये धरत फळ्यावर लिहिलेले वाचणे तसेच पायाने लिहणे सुरू केले. आता तो चौथीच्या वर्गात शिकत आहे. त्याला हात नाही, असे तो मानतच नाही, तो इतर मुलांप्रमाणेच खेळतो, बागडतो. शालेय पोषण आहारात मिळणारी खिचडी तो पायात चमचा धरून खातो. अशाप्रकारे कार्तिक स्वावलंबी झाला आहे. यात शाळेचे मुख्याध्यापक भाऊसिंग सोनवणे व शिक्षिका सुरेखा वाघ यांचा मोलाचा वाटा आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news