हमिदवाडा : पुढारी वृत्तसेवा बालआरोग्य मोहिमेमुळे व्याधिग्रस्त चिमुकल्यांचे जीवन सुंदर होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी व्यक्त केला. गावोगावी होणार्या या मोहिमेत अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या तपासण्या करून त्यांचे भवितव्य घडवा, असेही ते म्हणाले. अर्जुनी (ता. कागल) येथे स्टर आधार हॉस्पिटल, आरोग्य विभाग व नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बाल आरोग्य मोहिमेचा प्रारंभ झाला. कागल व गडहिंग्लज विभागातील सुमारे 125 गावांत ही मोहीम राबवली जाणार आहे.
चव्हाण म्हणाले, या मोहिमेंतर्गत प्रत्येक बालकाच्या तपासणीसाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शिक्षक व पालकांनीही पुढाकार घ्यावा. फाऊंडेशनचे अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रेरणेतून आम्ही ही मोहीम राबवित आहोत. ही मोहीम गावांसह वाड्या-वस्त्या व घराघरांपर्यंत पोहोचवणार आहोत. यावेळी 'गोकुळ'चे संचालक युवराज पाटी, केडीसीसीचे संचालक भैय्या माने, 'बिद्री'चे संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादीचे विकास पाटील यांचीही भाषणे झाली.
व्यासपीठावर सरपंच वर्षा सुतार, उपसरपंच सुनील देसाई, राजन देसाई, रणजित देसाई, तुकाराम देसाई, मयूर आवळेकर, स्टर आधारच्या डॉ. श्वेता गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई, गटविकास अधिकारी सुशील संसारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित शिंदे आदी उपस्थित होते. स्वागत सुदाम देसाई यांनी केले. प्रास्ताविक बाजीराव चौगले यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार नामदेव चौगुले यांनी मानले.
प्रारंभाचा असाही योगायोग
स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक व मंत्री मुश्रीफ हे प्रचारासह प्रत्येक कामाचा प्रारंभ अर्जुनी येथूनच करत. पहिली विधानसभा निवडणूक हरल्यानंतर आभार दौर्याला मुश्रीफांनी येथूनच सुरुवात केली होती. बालआरोग्य माहिमेचीही सुरुवात येथूनच होत आहे. या योगायोगाचा उल्लेख मान्यवरांनी वारंवार केला.