कोल्हापूर : बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, चिंता, मद्यपान, धूम्रपान यामुळे नागरिकांचे हृदय कमकुवत होत चालले आहे. हृदयाची धडधड थांबल्याने कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत 2 हजार 165 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दिवसागणीक हृदयविकाराचे प्रमाण वाढत असून, जिल्ह्यात दररोज 80 हून अधिक रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया व उपचार केले जात आहेत. गेल्या तीन वर्षांत तब्बल 94 हजार 920 रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले आहेत. यामुळे वेळीच सावध होऊन हृदयाचे आरोग्य सांभाळा.
* बदलती जीवनशैली, व्यसनाधीनतेमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढले
* दररोज 80 जणांवर होतेय हृदय शस्त्रक्रिया
* 3 वर्षांत 95 हजार जणांवर शस्त्रक्रिया व उपचार
* राज्यात वर्षात 1 लाख 38 हजार 287 रुग्णांवर उपचार
जिल्हा प्रशासनाच्या एका अहवालानुसार, गेल्या वर्षात 670 जणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. यामध्ये 344 पुरुषांचा, तर 326 महिलांचा समावेश आहे. 2022 साली 740 जणांचा, तर 2021 साली 755 जणांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला आहे. हा सरकारी आकडा असून, प्रत्यक्षात हे प्रमाण अधिक असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. यामुळे कोल्हापूरकरांनो, जागतिक हृदय दिनानिमित्त उत्तम हृदयाच्या आरोग्यासाठी एक संकल्प करण्याची गरज आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्यावर्षी 32,258 जणांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. 2022 साली 29 हजार 770, तर 2021 साली 32,892 रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले आहेत.
राज्यात हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. 2021 साली 89 हजार 782 जणांवर हृदय शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले होते. 2022 साली 1 लाख 15 हजार 576 रुग्णावर, तर 2023 साली 1 लाख 38 हजार 287 रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले होते.
गेल्या तीन वर्षांत हृदयविकारामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत जास्त आहे. हृदयविकारामुळे 1 हजार 168 पुरुषांचा, तर 997 महिलांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुरुषांनो, जरा हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष द्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
धूम्रपान, तंबाखू सेवन, मद्यपान, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह, असंतुलित आहार, ताणतणाव, सतत चिडचिड, यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.