

कोल्हापूर : प्रस्तावित बोगद्यामुळे किती कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागेल, त्यासाठी किती निधी हवा, याची माहिती जागतिक बँकेच्या पथकाने घेतली. गुरुवारी कोल्हापुरात दाखल झालेल्या या पथकाने राधानगरी धरण, करंजफेण ते नरतवडे या प्रस्तावित बोगद्याची (टनेल) पाहणी केली.
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे, तालुक्यातील दरडी कोसळणार्या परिसराची पाहणी करून हे पथक कोल्हापुरात परतले. प्रयाग चिखली येथील नदी संगम, कोल्हापूर शहरातील सुतारमळा येथे पाहणी करून जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांकडून माहिती घेतली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील महापुराचे नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात वळवणे, याकरिता राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ (एमआरडीपी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेची मंजुरी मिळाली आहे. 3 हजार 200 कोटींच्या या प्रकल्पासाठी जागतिक बँक 2 हजार 338 कोटी रुपयांचे वित्तसाहाय्य करणार आहे. या पार्श्वभूमीवर हा दौरा सुरू आहे.
जागतिक बँकेच्या या पथकात युकीओ टनाका आणि रुमिता चौधरी यांचा समावेश आहे. तर या पथकासोबत जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, रोहित बांदिवडेकर, उपअभियंता प्रवीण पारकर, केतान बारदेसकर, मित्राचे अमोल जरग, व्ही. एम. कुलकर्णी उपस्थित होते.