

उजळाईवाडी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव हद्दीत रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भरधाव ट्रकने स्कूटरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. गीता वसंत जगताप (वय ४५, रा. सहारा कॉलनी, सरनोबतवाडी, ता. करवीर) असे मृत महिलेचे नाव आहे.
या अपघातात तिचे पती वसंत पंडित जगताप (४८) आणि नात विभूती आतिश जगताप (२) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जगताप कुटुंब स्कूटरवरून कागलच्या दिशेने जात होते. उजळाईवाडी ओलांडून गोकुळ शिरगाव येथील मयूर पेट्रोल पंपासमोर आले असता, भरधाव ट्रकने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. धडकेमुळे गीता जगताप रस्त्यावर पडल्या आणि ट्रकचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उजळाईवाडी महामार्ग पोलिस आणि गोकुळ शिरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.