

सुनील सकटे
कोल्हापूर : राज्यातील मालवाहतूक आणि एकूणच वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण असणार्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या विविध जिल्ह्यांतील सीमा तपासणी नाके (चेकपोस्ट) बंद करण्यात येणार आहेत. राज्य शासनाने याद़ृष्टीने हालचाली गतिमान केल्या आहेत. चेकपोस्ट बंद झाल्यास वाहनांच्या ओव्हरलोड तपासणीसह वाहने सुस्थितीत आहेत की नाही हे समजण्यास वाव मिळणार नाही.
कर्नाटक, गुजरातसह महाराष्ट्राच्या शेजारी असणार्या राज्यांच्या सीमेवर महाराष्ट्र परिवहन विभागाने सीमा तपासणी नाके (चेकपोस्ट) सुरू केले आहेत. राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कोल्हापूर, वसई, पनवेल, सोलापूर, नाशिक, धुळे, लातूर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर अशा दहा प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत 23 ठिकाणी सीमा तपासणी नाके कार्यरत आहेत. कोल्हापूरात कागल आणि चंदगड या दोन ठिकाणी नाके आहे. या नाक्यांवर मोटर वाहन निरीक्षक साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांच्या नेमणुका करुन चोवीस तास वाहनांची तपासणी केली जाते. यामुळे परराज्यातुन येणार्या वाहनांची तपासणी केल्याने वाहने सुस्थितीत आहे. टॅक्स भरले आहेत. शासनाच्या नियमानुसार माल भरला आहेत का, याची खतरजमा होते. त्यासाठी तेथे मालवाहतूक वाहनांतील मालाचा लोड तपासण्यासाठी वजनकाटा उपलब्ध केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे 10 ते 12 कोटी रुपयांचा महसूल सीमा तपासणी नाक्यातून उपलब्ध होते. तर राज्यातील विविध नाक्यातून शेकडो कोटी रुपयांचा महसूल शासकीय तिजोरीत जमा होतो. मालवाहतूक करताना वाहनधारकांना सुटसुटीत व्यवस्था होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. या निर्णयाने आता तपासणी यंत्रणाच बंद होणार असल्याने वाहने सुसाट पळणार आहेत. काही अपवाद वगळता अनेक वाहनांचे टॅक्स, वाहनांची सुस्थिती याबाबत अधिकार्यांमध्ये साशंकता आहे. तसेच दारु, गांजाची तस्करी अशा अनेक अवैध प्रकारांना चेकपोस्टमुळे निर्बंध आहेत. चेकपोस्ट बंद होणार असल्याने हे अवैध/बेकायदा व्यवसाय फोफावणार असल्याची शक्यता आहे.
वायुवेग पथकांमार्फत होणार तपासणी
चेकपोस्ट बंद होणार असल्यानेआरटीओ कार्यालयांना वायुवेग पथकांमार्फत वाहनांची तपासणी करावी लागणार आहे. महामार्गावर आणि इतर मार्गावर वाहने अडवून तपासणी करावी लागणार आहे. मात्र तेथे ओव्हरलोड तपासणीसाठी वजनकाटा उपलब्ध नसल्याने मोठी पंचाईत होणार आहे. तसेच एकावेळी ठराविक वाहनांचीच तपासणी होणार असल्याने सरसकट वाहनांची तपासणीचा प्रश्न निर्माण होणार आहे.