

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्था आणि सुरू असणार्या प्रकल्पांवर देखरेख राहण्यासाठी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांचे कार्यालय आता कोल्हापुरात सुरू होणार आहे. या नव्या कार्यालयाचा कारभार एक जूनपासून सुरू होणार आहे. याबाबतचा आदेश नुकताच झाला आहे.
जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांचे कार्यालय पुणे येथे होते. जलसंपदा आणि विशेष प्रकल्प, अशी दोन मुख्य अभियंता कार्यालये पुण्यात एकाच ठिकाणी कार्यरत होती. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रकल्पांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी ज्या भागात प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, जिथे सिंचन व्यवस्था अधिक आहे, तिथे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, जलसंपदा विभागाचे पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालय कोल्हापुरात, तर विशेष प्रकल्प मुख्य अभियंता कार्यालय सोलापूर येथे स्थलांतरित करण्यात येत आहे. या दोन्ही कार्यालयांचे प्रत्यक्ष कामकाज एक जूनपासून सुरू करण्यात येणार आहे.
महापुरावेळी निर्णय होणार गतीने
कोल्हापूर, सांगली महापुरावेळी अलमट्टी धरण असो अथवा विविध धरणांतील पाणी सोडण्याच्या नियोजनासाठी मुख्य अभियंता कार्यालयास संपर्क करावा लागत असे. आता कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता ही सर्वच कार्यालये कोल्हापुरात असल्याने महापुरावेळी आपत्कालीन स्थितीत निर्णय गतीने होण्यास मदत होणार आहे.