

पाचगाव : शाहूकालीन कळंबा तलावातील पाणीपातळी झपाट्याने घटत असून सध्या तलावातील पाणी केवळ दहा फुटांवर आले आहे. कळंबा, पाचगाव, कोल्हापूर शहरातील काही भागांना वर्षभर पाणीपुरवठा करणार्या या तलावातील साठा कमी होत असून उपशाचे योग्य नियोजन न केल्यास आगामी काळात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात ओव्हर फ्लो झालेल्या कळंबा तलावातून सध्या कोल्हापूर महानगरपालिकेकडून दररोज दीड एमएलडी, तर कळंबा ग्रामपंचायतीकडून सुमारे दोन एमएलडी पाण्याचा उपसा सुरू आहे. सात फुटांखालील साठा राखीव मानला जात आहे. गावाला सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उपसा कमी करण्याबाबत ग्रामपंचायतीने महापालिकेला पत्र दिले. त्यानुसार उपसा कमी केला असला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. वाढते तापमान आणि मोठ्या प्रमाणावर होणारे बाष्पीभवन यामुळे तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. टंचाई टाळण्यासाठी गाळ काढण्याच्या कामालाही गती देण्याची गरज आहे.
पाणी उपसा कमी करण्याबाबत महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार उपसा दीड एमएलडीपर्यंत कमी केला. मात्र महापालिकेने थेट पाईपलाईनचे पाणी वापरून तलावातील पाणी कळंबावासीयांसाठी राखीव ठेवावे.
- सुमन गुरव, सरपंच, कळंबा