

कोल्हापूर : विशाळगड प्रशासनाने भाविक, पर्यटकांसाठी खुला केला आहे. मात्र, गडावर जाणार्यांच्या पूर्ण नोंदी ठेवाव्यात, तसेच अन्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने गुरुवारी केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
प्रशासनाने विशाळगड पर्यटकांसाठी खुला केला आहे. मात्र काही धर्मीय आणि अन्य संघटनांच्या मागणीमुळे हा आदेश काढला का, असा सवाल करत गडावर जे पर्यटक जातात, ते अन्य हेतूने जात नाहीत ना, याकरिता आधार कार्ड तपासावे, त्यांच्या नोंदी ठेवाव्यात, गडावर गेलेले सर्व खाली येतात का हे तपासण्याची व्यवस्था करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे योगेश केरकर, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, किशोर घाटगे, शांतीदूत मर्दानी आखाडाचे सूरज केसकर, दत्ताजय जाधव, हिंदू महासभेचे मनोहर सोरप, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा संयोजक प्रमोद सावंत, हिंदू एकता आंदोलन शहराध्यक्ष गजानन तोडकर, विश्व हिंदू परिषदेचे अनिल दिंडे, कैलास दीक्षित, शरद माळी, सुनील सामंत, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे समन्वयक बाबासाहेब भोपळे, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, आनंदराव पवळ आदी उपस्थित होते.
कृती समितीने राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली. क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून विशाळगडावर येणार्या पर्यटकांच्या नोंदी योग्य प्रकारे होण्यासाठी सीसीटीव्ही बसवा, उर्वरित अतिक्रमण काढण्यासाठी वेळमर्यादा ठेवण्याच्या सूचना केल्या.