kolhapur | शहरासह सुमारे 100 गावांचे सांडपाणी थेट नदीत; पंचगंगेची अवस्था ‘गंभीर’

water pollution crisis
kolhapur | शहरासह सुमारे 100 गावांचे सांडपाणी थेट नदीत; पंचगंगेची अवस्था ‘गंभीर’
Published on
Updated on

पवन मोहिते

कसबा बावडा : कोल्हापूर शहर, करवीर तालुका आणि नदीकाठच्या सुमारे शंभर गावांमधील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याने पंचगंगेची अवस्था गंभीर बनत चालली आहे. औद्योगिक सांडपाणी, घरगुती मैलामिश्रित सांडपाणी आणि सांडपाणी प्रक्रिया अपुर्‍या यंत्रणेमुळे पंचगंगा गटारगंगा बनली असून जलजन्य आजार आणि दूषित पाण्यामुळे होणार्‍या संसर्गांचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक परिस्थिती आहे.

राजाराम बंधारा परिसरात नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा वाहत येतो. शहरातील अनेक गटारी, छोटे-मोठे नाले आणि उपनगरांतील सांडपाणी थेट पंचगंगेत सोडले जाते. नदी पात्रालगतच्या सुमारे शंभर गावांतील सांडपाणी थेट नदीत मिसळते. जयंती नाल्यावरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत असला, तरी लक्षतीर्थ, राजहंस, रमणमळा, कसबा बावडा, बापट कॅम्प वीटभट्टी आदी भागांतील मैलामिश्रित सांडपाणी नदीतच मिसळत असल्याचे वास्तव आहे. महापालिकेकडून 80 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्याचा दावा केला जात असला, तरी उर्वरित असंशोधित सांडपाणी पंचगंगेला प्रदूषित करत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पंचगंगा नदीकाठच्या 90 गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्ताव मांडला. प्रक्रिया केलेले पाणी एमआयडीसी उद्योग व कोरडवाहू शेतीसाठी वापरण्याची सूचनाही झाली. प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्यक्ष कृती कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news