

दिलीप भिसे
कोल्हापूर : वाहनचालकांच्या बेदरकार आणि निष्काळजीपणामुळे शहर व जिल्ह्यात अलीकडच्या काळात जीवघेण्या अपघाताच्या घटनांमुळे काळजाचा थरकाप उडू लागला आहे. अनेक निष्पाप रोड अपघाताचे बळी ठरू लागल्याने त्यांचा भरला संसार उद्ध्वस्त होऊ लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 2024 आणि 2025 या काळात 2 हजार 216 अपघातामध्ये एकूण 826 जणांना जीवाला मुकावे लागले आहे; तर गंभीर आणि किरकोळ स्वरूपात 1 हजार 991 जण जायबंदी झाले आहेत. पुणे-बंगळूर आणि रत्नागिरी- नागपूर महामार्गासह सांगली फाटा, इचलकरंजी परिसरात सर्रास घटना घडत आहेत.
वेग मर्यादेचे उल्लंघन करीत धोकादायकपणे वाहन भरधाव पळविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालविणे ही प्रमुख कारणे अपघाताच्या घटनांना कारणीभूत ठरत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनधारकाविरुद्ध दंडात्मक एव्हाना कायदेशीर कारवाईचा बडगा उगारूनही जीवघेण्या अपघाताचा टक्का दिवसेंदिवस वाढू लागला आहे.
शहर, जिल्ह्यात 2024 मध्ये लहान-मोठ्या स्वरूपाचे 1120 अपघात झाले. त्यात 410 जणांचे बळी गेले. 648 गंभीर आणि 355 किरकोळ जखमी झाले. जानेवारी ते डिसेंबर 2025 याकाळात 1096 अपघातात 416 मृत्युमुखी पडले. 624 जण गंभीर स्वरूपात जायबंदी झाले तर 360 जणांना किरकोळ इजा झाली. शहर, जिल्ह्यातील अपघाताची आकडेवारी काळीज धस्स करणारी आहे. शिवाय निष्षापांचा भरला संसार उद्ध्वस्त करणारा आहे.
वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणार्या 3, 679 इतक्या दोषींकडून 41 लाखाचा दंड वसूल.
चुकीच्या दिशेने वाहन पळविणार्या 42 जणांवर तर मद्यधुंद अवस्थेत भरधाव वाहने पळविणार्या 557 चालकांवर 95 हजार 500 रु.ची दंडात्मक कारवाई केली आहे.
धोकादायक स्थितीत वाहने पळविणार्या आणि 18 वर्षांखालील मुलाकडे वाहने देणार्या अनुक्रमे 245 आणि 557 जणांवर कायद्याचा बडगा उगारला आहे.