कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी जोतिबाची चैत्र यात्रा, त्याला जोडूनच आलेला अंबाबाई रथोत्सव आणि वीकेंड यामुळे शुक्रवार (दि. 3) ते रविवार (दि. 5) एप्रिल या कालावधीत तब्बल दोन लाख भाविकांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
अंबाबाई दर्शनला तर वर्षभर गर्दी असतेच; पण सध्या सुरू झालेल्या उन्हाळी सुट्ट्या आणि यात्रा-जत्रांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर परगावचे भाविक अंबाबाई दर्शनाला येत आहेत. नुकतेच वाडी रत्नागिरी डोंगरावरील श्री जोतिबा देवाची यात्रा बुधवारी झाली. या यात्रेसाठी लाखो भाविक कोल्हापुरात दाखल झाले होते. यात्रा झाल्यावर होणार्या शहरातील रथोत्सवांना भक्तांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी 3 रोजी 47025, शनिवारी 4 रोजी 69425, तर रविवारी वीकेंडच्या अखेरच्या दिवशी 81 हजार 925 भाविक अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आले होते. एकूण तीन दिवसांमध्ये अंबाबाई दर्शन घेणार्या भक्तांचा आकडा 2 लाखांवर पोहोचला. सध्या उन्हाळी सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे इथून पुढे दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढेल, असा अंदाज देवस्थान समितीने व्यक्त केला आहे.