कोल्हापूर : ऐतिहासिक गडकोट, निसर्गाचे वैविध्य आणि प्राचीन मंदिरांचे वैभव दाखवणारी धार्मिक स्थळे यामुळे कोल्हापूरच्या भटकंतीवर येणार्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. शुक्रवारपासून सलग तीन दिवसांमध्ये अडीच लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद झाली तर शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळेही बहरली. त्यामुळे कोल्हापूरच्या पर्यटनासाठी सलग सुट्टी ‘लाख’मोलाची ठरली.
सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे सहकुटुंब तसेच मित्रपरिवारासह कोल्हापूरच्या पर्यटनाला पसंती दिली जात आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, पन्हाळा किल्ला, नृसिंहवाडी, कणेरीमठ, रंकाळा तलाव, टाऊन हॉलवस्तूसंग्रहालय, न्यू पॅलेस म्युझियम, गगनबावडा, भुदरगड, विशाळगड, राधानगरी, काळम्मावाडी ही पर्यटनस्थळे बहरली होती.
कोल्हापुरी चटणी, मसाले, गूळ, कोल्हापुरी साज, दागिने, चांदीची आभूषणे, अंबाबाईच्या मूर्ती, प्रतिमा, चप्पल, इरकली साड्या यांच्या खरेदीलाही चांगली पसंती असते. गेल्या तीन दिवसांत पर्यटकांचा प्रतिसाद मिळाल्याने मोठी आर्थिक उलाढाल झाली. हॉटेलमध्ये गर्दी दिसत होती.
पावसाने तारांबळ
रविवारी कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. बाजारपेठेत खरेदीसाठी पर्यटक फिरत होते. काही पर्यटक अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव परिसरात होते. सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास वारे सुटले आणि पाऊस आला. अचानक आलेल्या पावसाने पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली.