

गवसे : किट्टवडे (ता. आजरा) परिसरातील जंगलात काही महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या टस्करने आता गावाजवळील धनगरवाड्यात मानवी वस्तीतच भरदिवसा प्रवेश केल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. या हत्तीने ऊस व भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
धनगरवाड्यातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण व दैनंदिन कामासाठी किट्टवडे येथे पायी जावे लागते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पहाटेच घराबाहेर पडावे लागते; मात्र याच परिसरात हत्तीचा वावर वाढल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. हातावर पोट असलेल्या ग्रामस्थांच्या कामावरही याचा परिणाम झाला आहे. काही दिवसांपूर्वी हत्तीने शाळेजवळच ठाण मांडल्याने चिंता अधिक वाढली आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी वन विभागाने तातडीने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.