

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली असून बाजारपेठेत प्रति किलो केवळ ६ रुपये असा अत्यल्प दर मिळत आहे. या घसरलेल्या दरांमुळे पिकाचा काढणी खर्चही निघणे कठीण झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर दर्जेदार टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. यात तालुकाभरातील टोमॅटो उत्पादकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शिरोळ तालुक्याला लाभलेली कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा या चार नद्यांची सुपीक जमीन भाजीपाला पिकांसाठी अत्यंत पोषक मानली जाते. या पार्श्वभूमीवर नांदणी, दानोळी, कोथळी, उदगाव, गणेशवाडी, दत्तवाड आणि कुरुंदवाड या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली आहे. एका एकरातील टोमॅटोच्या पिकासाठी शेतकऱ्यांना सरासरी दीड लाख रुपयांपर्यंतचा भांडवली खर्च आला आहे.
मात्र, सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने आणि योग्य भाव न मिळाल्याने दर पुरते कोसळले आहेत. टोमॅटो तोडणी, वाहतूक आणि मजुरीचा खर्चही या दरातून भरून निघत नसल्याने मूळ भांडवल तर लांबच, पण हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांनी शेलका व चांगल्या दर्जाचा टोमॅटो शेतातून काढून थेट रस्त्यावर फेकून देण्यास सुरुवात केली आहे.
"मी अर्धा एकर क्षेत्रात टोमॅटोचे पीक घेतले असून त्यासाठी मला तब्बल ८० हजार रुपये खर्च आला आहे. सध्या पिकातून चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळत आहे; मात्र बाजारात प्रति किलो केवळ ६ रुपये भाव मिळत असल्याने काढणीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे हताश होऊन दर्जेदार टोमॅटो रस्त्यावर टाकण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय उरलेला नाही.
— प्रवीण कनवाडे (टोमॅटो उत्पादक शेतकरी, गणेशवाडी)