कसबा बावडा : येथील भगवा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. रविवारी महाराजांचा पुतळा व परिसर जलाभिषेक करून शुद्धीकरण करण्याचा मेसेज व्हॉटस्अॅपवर सकल हिंदू समाज, कोल्हापूर या नावाने फिरत होता. या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींनी सकाळपासून भगवा चौकात ठाण मांडले आहे. कोणीही अशा प्रकारचे कृत्य केल्यास, त्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. सकाळी भगवा चौकातील वातावरण तणावपूर्ण होते. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
रविवारी सकाळी 10 वाजता पुतळा व परिसर शुद्धीकरण करणारा मेसेज व्हॉटस्अॅपवर फिरत होता. ‘ठेंगडी काढून बसलोय, येऊन दाखवा पुतळ्याजवळ! आमच्या महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, कळ काढलीसा की, गप बसणार नाही. जाळ आणि धूर संगट निघणार’ असे प्रतिआव्हान देणारा मेसेजही समस्त बावडेकरांकडून व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. एकूणच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लक्षवेधी कार्यक्रमामुळे राजकीय कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. यातूनच समाज माध्यमातून आव्हान-प्रतिआव्हान देणे सुरू झाले आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्या लोकांनी हा मेसेज समाजमाध्यमावर पसरवला त्या चार लोकांना रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. यानंतरही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भगवा चौकामध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त कायम होता.