

कोल्हापूर : श्री करवीरनिवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यांतर्गत आवश्यक भूसंपादन केले जाणार आहे. शनिवारपासून (दि. 2) प्राथमिक सर्वेक्षण केले जाणार आहे. याकरिता तीन पथकांची स्थापना केली आहे. या पथकांत महसूल, महापालिका आणि नगरभूमापन विभागाच्या कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.
राज्य शासनाने 1,445 कोटी 95 लाखांच्या अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याला 6 मे 2025 रोजी मान्यता दिली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 143 कोटींच्या कामांना प्रारंभ झाला आहे. दुसर्या टप्प्यात मंदिर परिसरातील कामांसाठी भूसंपादन केले जाणार आहे. भूसंपादन प्रक्रिया पारदर्शी आणि गतीने व्हावी, याकरिता परिसरातील मिळकतींचे मूल्यांकन करण्यासाठी ‘क्षेत्रीय तपासणी व मूल्यांकन समिती’ स्थापन केली आहे. या समितीने प्रस्तावित संपादित होणार्या जागेवरील मिळकतींचे प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी घेतला आढावा
दरम्यान, करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. आराखड्याबाबत काढण्यात आलेले आदेश, आराखड्यातील कामांचे प्लॅन, त्यानुसार सुरू असलेले कामांचे टप्पे, त्याची सद्यस्थिती आदींची त्यांनी माहिती घेतली.
सर्वेक्षणानंतर हे होणार
* प्रस्तावित क्षेत्रातील सर्व सर्व्हे नंबर, त्याच्या सर्व क्षेत्राची यादी
* फेरफारनुसार मूळ मालक, इतर हक्कातील व्यक्तींची माहिती संकलन
* जमिनीवरील सध्याची स्थिती यांच्या नोंदी
* जमिनीवरील विहिरी, बोअरवेल, घरे, झाडे यांची मोजणी, सविस्तर वर्णन
* संबंधित क्षेत्राचे मागील तीन वर्षांचे खरेदी-विक्री व्यवहार तपासणार
* चालू रेडीरेकनरनुसार जागांचे प्राथमिक मूल्यांकन होणार
* सर्व माहिती एकत्र करून, नकाशासह संयुक्त मोजणी अहवाल सादर
प्राथमिक सर्वेक्षण; अचूक माहिती द्या पथकातील कर्मचारी मिळकतधारकांना भेटून सर्वेक्षण फॉर्म भरून घेणार आहेत. संबंधितांनी त्यांना आपली अचूक माहिती द्यावी. या संकलित माहितीवरूनच परिसर विकासाची पुढील कार्यवाही करणे सुलभ होणार आहे.
मोसमी चौगुले, प्रांताधिकारी तथा समिती अध्यक्ष