

कोल्हापूर : आशिष शिंदे
ती मला पाहिजेच, काहीही झाले तरी मी प्रेमप्रकरणात यशस्वी झालोच पाहिजे, अशा मोहामुळे प्रेमवेडे अनेक तरुण सध्या भोंदूबाबांच्या मायाजालात अडकत चालले आहेत. तिला पटवण्यासाठी या मंत्राचा जप करा, तिचे नाव लिहून तिचा फोटो झाडाला लटकवा, विशिष्ट वस्त्र किंवा केस मिळवून पूजा करा असे अनेक विचित्र अघोरी उपाय भोंदूबाबांकडून तरुणाईला सुचवले जात आहेत. हे सारे चित्र दुसर्या कोणत्या जिल्ह्यातील नाही, तर पुरोगामी समजल्या जाणार्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागात अशा भोंदू बाबांचा अक्षरशः सुळसुळाट सुरू आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात भोंदू बाबांची पॉवर चांगलीच वाढली आहे. अगदी बैलगाडी, घोडागाडी, श्वान शर्यत जिंकण्यापासून ते प्रेमप्रकरणात यशस्वी होण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींवर अघोरी उपाय या बाबांकडून सुचवले जात आहेत.
सध्या वाड्या-वस्त्यांपासून ते अगदी शहरांपर्यंत बैलगाडा, घोडागाडी, श्वान आणि म्हशीच्या शर्यतींची क्रेझ आहे; मात्र या शर्यतींनादेखील भोंदूबाबांनी अंधश्रद्धेचे ग्रहण लावले आहे. रुमाल टाकताच बैल जाग्यावर बसणारच, असे चॅलेंज या भोंदूंकडून दिले जाते. त्यामुळे असल्या भोंदूबाबांना चार-पाचशे रुपये द्यायचे, बैलावरून लिंबू ओवाळून टाकायचा, शर्यतीच्या मैदानावर प्रतिस्पर्धी बैलाच्या नावाने नारळ फोडणे, अंगारा फुंकणे, लिंबू ओवाळून फेकण्यासारखे प्रकार पाहायला मिळत आहेत.
सध्या तर बैलगाडा शर्यत अंधश्रद्धेच्या मगरमिठीत अडकली आहे. आपला बैलच जिंकावा, यासाठी शर्यत सुरू होताच भोंदूबाबाला फोन लावला जातो. प्रतिस्पर्धी बैलाचे नाव सांगितले जाते. आपल्या पुढे किती गाड्या आहेत, आपल्या मागे किती गाड्या आहेत ही सर्व माहिती दिली जाते. यानंतर बाबाकडून सूचना दिल्या जातात.
शहराजवळच्या गावांमध्ये भोंदूबाबांची पॉवर सध्या चांगलीच वाढली आहे. अघोरी कृत्यांमुळे गावकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. ठरावीक दिवशी तर इतकी गर्दी होते की, गावात पाय ठेवायला जागा नसते. स्मशानभूमीत अघोरी कृत्य होत असल्याने हणमंतवाडी ग्रामपंचायतीला स्मशानभूमीत अक्षरशः सीसीटीव्ही बसविण्याची वेळ आली आहे.’