

Kolhapur Ratnagiri highway accident
विशाळगड : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात दख्खन गावाजवळ शुक्रवारी (दि.२४) पहाटे एका भीषण अपघाताची घटना घडली. साखरेची पोती घेऊन जाणारा मालवाहू ट्रक (क्र. MH 10 DT 4409) चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याशेजारील १० फूट खोल खड्ड्यात (मोहरीत) कोसळला. या घटनेत चालक मोहम्मद समशेर अनसारी (वय ३६, रा. झारखंड) यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेली माहिती अशी की, हा ट्रक फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्यातून ३० टन साखर घेऊन जयगडकडे चालला होता. दख्खन गावाजवळील एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि अवजड ट्रक थेट खंदकात कोसळला. ३० टन मालाच्या प्रचंड वजनामुळे ट्रकच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला, यामध्ये चालक अडकला गेला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक घावरे, पी.एस.आय. प्रमोद वाघाटे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी आणि पोकलॅनच्या सहाय्याने सुमारे दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर केबिनमध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. साखरपा येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. सृष्टी डोरले यांनी चालकास मृत घोषित केले.
या भीषण अपघातात साखरेची पोती इतरत्र विखुरली असून, ट्रक व मालाचे मिळून सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. देवरुख पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, झारखंडहून नातेवाईक आल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जाणार आहे.
आंबा घाटात ही दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळापासून अवघ्या पाच फुटावर मोठी खोल दरी होती परंतु त्या दरम्यानच मोहरीचा खड्डा असल्यामुळे ट्रक पुढील भागावर दाबून राहिला. अन्यथा चालकासह अवजड ट्रक दरीत कोसळला असता परिणामी ट्रक आणि मृतदेह वरती काढणे कठीण झाले असते. संरक्षक कठडे नसल्यामुळे अशा अपघातांना हे वळण अति धोकादायक ठरत आहे. कठडा असता तर अपघात टळला असता अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. त्यामुळे येथे संरक्षण कठडे तात्काळ उभारणे आवश्यक आहे.