

कोल्हापूर : वळवानंतर शेताची मशागत सुरू होताच शिवारात सापांचा वावर वाढतो. कामाच्या घाईत दुर्लक्ष होऊन सर्पदशांच्या घटना वाढतात. वेळीच उपचार मिळाले नाहीत, तर शेतकर्यांचा मृत्यू होतो. गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यात 518 जणांना सर्पदंश झाला. यात दोघांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात वळीव झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीसाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे. तसेच पावसाळ्यासाठी सरपण साठवून ठेवण्याची गडबड सुरू आहे. कामाच्या घाईत लपलेले साप, विंचू दिसून येत नाहीत. त्यावेळी ते दंश करतात. यात नाग, घोणस, मण्यार, फुरसे अशा विषारी सापांचा दंश जीवघेणा ठरतो. त्यामुळे शेतकर्यांनी काळजी घेतली पाहिजे. चुकून सर्पदंश झाला, तर घरगुती उपचार टाळून त्वरित शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.
ही खबरदारी महत्त्वाची
अडगळीच्या जागी जाताना जमिनीवर आवाज करावा. वैरण काढताना परिसराचा अंदाज घ्यावा. साफसफाई करताना अडगळीच्या जागी खबरदारी घ्या. शेतात काम करताना गमबूट, हातमोजे वापरा. सर्पदंश होताच त्वरित शासकीय रुग्णालयात जा. सर्पदंश झाल्यानंतर घाबरू नये. घरगुती अघोरी उपाय टाळा.