

कोल्हापूर : बाराशे वर्षांचा वारसा लाभलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला राज्य संरक्षित वास्तू दर्जा देण्याबाबत गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेली अंतिम अधिसूचना काढण्यासाठी राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. संबंधित अध्यादेशाची प्रक्रिया नव्याने करावी लागणार असल्याने सरकारने केलेल्या मुदतवाढीची विनंती मान्य करत सोमवारी झालेल्या सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला.
कोल्हापुरातील याचिकाकर्ते गजानन मुनिश्वर यांनी २० जुलै २०१६ रोजीची अंतिम अधिसूचना आजतागायत काढण्यात आलेली नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. यासंदर्भात न्यायमूर्ती वृषाली जोशी आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या डिव्हिजन बेंचसमोर या याचिकेवर २० जुलै २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्त्वीय स्थळे आणि अवशेष अधिनियम, १९६० च्या कलम ४ (३) अंतर्गत पंधरा दिवसांत अंतिम अधिसूचना काढण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.