

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेतील अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेने काळम्मावाडी धरण क्षेत्रातील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. धरणातील पाणीपातळी कमी झाल्याने सध्या गाळ काढण्याचे काम सोयीचे झाले असून, पावसाला सुरुवात झाल्यानंतर हे काम करणे कठीण होणार आहे.
काळम्मावाडी धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. यासाठी धरणाच्या जॅकवेल उभारण्यात आले आहे. जॅकवेलपासून सुमारे एक हजार मीटर अंतरावर धरण क्षेत्रात तीन इंटेक विहिरी बांधण्यात आल्या आहेत. या इंटेक विहिरीतून पाणी जॅकवेलपर्यंत आणले जाते. जॅकवेलचे बांधकाम करताना पाण्याचा अडथळा होऊ नये म्हणून धरणात मातीचे बंधारे घालून पाणी अडविण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर हे मातीचे बंधारे हटविण्यात आले नाहीत. त्यामुळे कालांतराने या मातीचा गाळ तयार झाला असून तो इंटेक विहिरी तसेच इंटेक विहिरीपासून जॅकवेलपर्यंत जाणाऱ्या पाईपलाईनमध्ये साचला आहे. गाळ साचल्यामुळे थेट पाईपलाईन योजनेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून पाणी प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेच्या धरणक्षेत्रातील इंटेक विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू झाले. (छाया : नाज ट्रेनर)