कोल्हापूर : शहरातील दोन एसटीपी प्रकल्प बंद असल्यामुळे आठ नाल्यांचे पाणी थेट नदीमध्ये मिसळत आहे. पंचगंगा प्रदूषणाची पुन्हा श्वेतपत्रिका काढून जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली. मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत यांना देण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी ठाकरे गटाने आंदोलन केले. यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदूषणमुक्तीची शपथ घेऊन पंचगंगेच्या पाण्याचे पूजन केले. प्रदूषणास कारणीभूत घटकांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. शासनाने नदी प्रदूषणाबाबत पुन्हा श्वेतपत्रिका काढावी. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना लेखी कळवावे. प्रदूषणास कोल्हापूर, इचलकरंजी मनपा आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबादार आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, शहरातील वाढत्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तातडीने नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे मंजूर करावीत अशा मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी शहरप्रमुख मंजित माने, शहर प्रमुख विशाल देवकुळे, जिल्हा महिला संघटक, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, आसावरी सुतार, अवधूत साळोखे, प्रसाद कुलकर्णी, सुनील जाधव उपस्थित होते.