

कोल्हापूर : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या, राज्यातील तीर्थक्षेत्रे जोडणार्या शक्तिपीठ महामार्गातून जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुका वगळला जाणार आहे. आता हा महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार असून, त्यासह सुधारित नव्या रेखांकनाला राज्य शासनाने बुधवारी मान्यता दिली. या नव्या रेखांकनानुसार, ‘शक्तिपीठ’ आता पन्हाळा, करवीर आणि चंदगड तालुक्यांतूनही जाणार आहे. मात्र, गावनिहाय अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग नेमका कोणत्या गावांतून आणि कसा जाणार आहे, हे स्पष्ट होणार आहे.
राज्य शासनाने नागपूर-गोवा शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाच्या रेखांकनाला 7 एप्रिल 2024 रोजी मान्यता दिली होती. मात्र, या प्रस्तावित महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यात मोठा विरोध झाला. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील भूसंपादनाची अधिसूचना 15 ऑक्टोबर 2024 रोजी रद्द केली. यानंतर 28 ऑगस्ट 2025 रोजी पवनार ते सांगलीदरम्यानची आखणी कायम ठेवण्यास मान्यता देऊन उर्वरित आखणीचे उपलब्ध सर्व पर्याय व संभाव्य पर्यायांबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. रस्ते विकास महामंडळाने संबंधित लोकप्रतिनिधींशी चर्चा करून, प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणींचा अभ्यास करून सुधारित आखणी अंतिम केली. त्यानुसार वर्धा, यवतमाळ, बीड व लातूर या जिल्ह्यांमधील आखणी कायम ठेवून अन्य जिल्ह्यांतील मूळ मंजूर आखणीत सुधारणा केली.