

शिरढोण: शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या सांडपाण्यामुळे शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंगळवार, २८ एप्रिल रोजी शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला असून, प्रशासन निष्क्रिय असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
ग्रामपंचायतीचे सांडपाणी थेट शेतात सोडले जात असल्यामुळे शेतीची मशागत पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, कोल्हापूर) यांना निवेदन देण्यात आले आहे.
शिरढोण येथील रुद्र टेककडे जाणाऱ्या रस्त्यालगत गट क्रमांक ११५४ व ११५५ मधील शेतजमिनीत ग्रामपंचायतीचे सांडपाणी खुल्या गटारातून सोडले जात असल्याची तक्रार शेतकरी विद्याधर भूपाल माणगावे, सुभाष बाळासो भोकरे, धनंजय श्रीपाल माणगावे आणि श्रीकांत सुभाष माणगावे यांनी केली आहे. या सांडपाण्यामुळे रब्बी व खरीप हंगामातील मशागत रखडली असून, शेतजमीन पाणथळ बनल्याने उत्पादन धोक्यात आले आहे.
या समस्येबाबत वारंवार तक्रारी, उपोषण व पाठपुरावा करूनही ग्रामपंचायत, बीडीओ कार्यालय शिरोळ, पाणीपुरवठा विभाग तसेच वरिष्ठ प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. २७ एप्रिलपर्यंत शेतात येणारे सांडपाणी थांबवले नाही, तर २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला असून, त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.