

कोल्हापूर : घरगुती गॅसच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. महागाई नियंत्रणाच्या नावाखाली सरकार जनतेला टप्प्याटप्प्याने दरवाढीचे झटके देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोल्हापुरात एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवार बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधानांनी महागाई नियंत्रणात असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात जनतेवर दरवाढीचा बोजा टाकला जात आहे. महागाई नियंत्रण म्हणजे जनतेला टप्प्याटप्प्याने झटके देणे, हेच सरकारचे सूत्र दिसते. गॅसच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक खर्चावर थेट परिणाम होतो. वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडत असून याची जाणीव सत्ताधाऱ्यांना योग्यवेळी होईल, असे पवार यांनी सांगितले.
खासदार पवार यांची भेट घेण्यासाठी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर), नंदाताई बाभुळकर, गोकुळचे माजी संचालक रामराजे कुपेकर, मदन कारंडे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष आर. के. पोवार, अनिल घाडगे, संजय तेलनाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.