

Shahuwadi Kadvi Kasari River Water Storage
सुभाष पाटील
विशाळगड : रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे गेल्यामुळे शाहूवाडी तालुक्यात यंदा खरिपाच्या हंगामावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. जून महिना अर्धा संपला तरी पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमालीचा जटील बनला आहे. गतवर्षी १८ जूनपर्यंत कडवी क्षेत्रात २७० मिमी पावसाची नोंद झाली होती; मात्र यंदा पावसाने शून्य टक्का गाठल्याने शाळी, कडवी आणि आंबार्डी या नद्यांची पात्रे कोरडी ठणठणीत पडली असून, अंकुरलेली पिके आता पाण्याच्या अभावामुळे होरपळू लागली आहेत.
तालुक्यातील सुजलाम् सुफलाम् शेती प्रामुख्याने कडवी, पालेश्वर, गेळवडे आणि मानोली धरणांच्या प्रवाहावर अवलंबून आहे. परंतु, पावसाच्या प्रदीर्घ विलंबामुळे या जलप्रकल्पांतील साठा वेगाने तळ गाठत आहे. सद्यस्थितीत कडवी मध्यम प्रकल्पात ३० टक्के, पालेश्वरमध्ये १६.४९ टक्के, मानोलीत ४१.२३ टक्के, तर कासार्डे धरणात २२.८५ टक्केच पाणी शिल्लक आहे. कासारी धरणासह कुंभवडे, केसरकरवाडी, पोंबरे, पडसाळी, नांदारी या पाच लघु प्रकल्पांतील परिस्थितीही १५ ते २८ टक्क्यांवर येऊन ठेपली आहे.
पावसाच्या अनिश्चिततेमुळे केवळ ५ ते १० टक्के क्षेत्रावरच धूळवाफ पेरण्या उरकल्या आहेत. पाऊस आणखी लांबल्यास बियाणे वाया जाऊन 'दुबार पेरणी'च्या दुष्टचक्राला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. सध्या संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था पावसाच्या आशेवर चातकासारखी डोळे लावून बसली आहे.
खरीप हंगाम हा येथील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा हंगाम मानला जातो. विशेषतः मृग नक्षत्रातील पेरणी पिकांच्या वाढीसाठी पोषक मानली जाते. त्यामुळे शेतक-यांनी पावसाच्या अपेक्षेने आधीच शेतांची मशागत करून सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र अपेक्षित पावसाने अद्याप हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे
"यंदा जूनचा पंधरवडा उलटला तरी धरण क्षेत्रात शून्य टक्के पाऊस झाला आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. कडवी धरणात आता केवळ ३० टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता, शेतीपेक्षाही आगामी काळातील पिण्याच्या गरजांचा प्राधान्याने विचार करून उपलब्ध जलसाठ्याचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करण्यात येत आहे." -
- खंडेराव गाडे , अभियंता, कडवी धरण