

कोल्हापूर : अकरावी प्रवेशाच्या केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेत वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने पालक व विद्यार्थी त्रस्त आणि यंत्रणा सुस्त असे चित्र निर्माण झाले असून प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ वाढत आहे.
सध्या अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सुरू असून, विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम निश्चित करण्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. 21 मेपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेसाठी 23 मेपर्यंत मुदत देण्यात आली असली तरी तांत्रिक अडचणींमुळे हजारो विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू आहे. नेट कॅफे, ऑनलाईन सेवा केंद्रे येथे सकाळपासूनच विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. मात्र वेबसाईट वारंवार बंद पडणे, सर्व्हर डाऊन होणे, लॉगिन न होणे, माहिती सेव्ह न होणे, ओटीपी उशिरा येणे अशा समस्यांमुळे प्रवेश अर्ज पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी दिवसभरात अपेक्षित अर्ज भरले जात नसल्याने पालकांमध्ये नाराजी वाढत आहे. प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याची खंत पालक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधांच्या अभावामुळे आणखी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अंतिम मुदत जवळ येत असताना विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवावी, सर्व्हर क्षमता वाढवून तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
कॉलेज प्राधान्यक्रम भरण्याची अंतिम मुदत : 24 मे
सर्व्हर डाऊन, लॉगिन अडचणी, माहिती सेव्ह न होणे, ओटीपी विलंबाने येणे