

कोल्हापूर : राज्यात सरकार तुमचे, तुम्ही मंत्री असताना त्या १४०० दूध संस्थांना त्रास का झाला? न्याय मिळवण्यासाठी तुम्हालाच न्यायालयात का जावे लागले? तुमचे सरकार असताना गोकुळवर प्रशासक आलाच कसा? महायुतीत तुमची ताकद कमी पडते का, असा थेट प्रश्न करत महायुतीत मंत्री हसन मुश्रीफ हतबल असल्याचा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला.
गोकुळ निवडणुकीसाठी राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या उमेदवारांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी अजिंक्यतारा कार्यालय येथे उमेदवारांनी आमदार पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, महायुतीतील घटक पक्षांपैकी एकाने तक्रार करायची आणि दुसऱ्याने त्याचे निरसन करायचे, एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे, असा प्रकार सुरू आहे. महायुती म्हणून गोकुळची निवडणूक एकत्र लढणार असे नेते म्हणत असतील, तर गेल्या सहा महिन्यांपासून दूध संस्थांवरून सगळा तमाशा सुरू होता का, असा सवाल त्यांनी केला. दूध उत्पादकांचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा, यासाठी आम्ही घेतलेली भूमिका तब्बल १५०० मतदारांना कळली आहे. त्यामुळे कोण कुणाच्या खांद्यावर बसून न्यायालयात गेले, याचा हिशेब दूध उत्पादकच करतील, असा पलटवार आमदार पाटील यांनी केला.
गोकुळची निवडणूक लढविणार
समविचारी आघाडीचे १८ ते १९ उमेदवार निश्चित झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत गोकुळची निवडणूक लढविणारच, असे आ. पाटील यांनी स्पष्ट केले. आमचे पॅनेल हे शेतकर्यांचे, दूध उत्पादकांचे आहे. आम्हला दूध उत्पादकांमधून चांगला प्रतिसाद असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.