

सावर्डे बुद्रुक : आपला पूर्वीचा गट एकच असून, आपली नाळ एकच आहे, असा कांगावा करीत काहीजण आमच्या लोकांना गावोगावी भेटत आहेत. परंतु, गेली 25 वर्षे ज्यांनी केवळ द्वेषापोटी विश्वासघाताने आमची वाट लावली, त्यांची वाट लावल्याशिवाय आता सोडायचं नाही, असा घणाघात माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केला. फसव्या भावनिक कथा सांगत येणार्यांना बळी पडू नका. त्यांना ठणकावून सांगून परतून लावा, असेही ते म्हणाले.
सावर्डे बुद्रुक, ता. कागल येथे मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना समरजित घाटगे यांचे नाव न घेता माजी आमदार श्री. संजयबाबा घाटगे यांनी हा प्रहार केला. घाटगे म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रचंड मतांनी विजयी करणे ही काळाची गरज आहे. गेली 25 वर्षे आपण त्यांच्याशी संघर्ष केला. मात्र, जेव्हा गरज होती, त्यावेळी त्यांनी पाठच्या भावापेक्षाही अधिक सहकार्य केले. म्हणूनच या निवडणुकीत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आपण नेहमी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करत आलो आहे. विकासकामे आणि जनसंपर्काच्या जोरावर जनतेने मला कायमच पाठबळ दिले आहे. या निवडणुकीतही आपण मोठ्या फरकाने विजयी होणार आहे. याचे शल्य विरोधी उमेदवाराला आहे. म्हणूनच विरोधी उमेदवार केवळ कुरघोड्या करत जनतेचा बुद्धिभेद करत आहे. विरोधकांचे काम तर काहीच नाही, मात्र केलेल्या कामाच्या चुका काढत मते मागत आहेत. जनता त्यांना कधीही थारा देणार नाही. यावेळी माजी जि. प. सदस्य भूषणदादा पाटील, मीनाक्षी पाटोळे, विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच मालुबाई शिंदे, पी. डी. हिरुगडे, पांडुरंग काशीद, डॉ. इंद्रजित पाटील, सागर सावर्डेकर आदी उपस्थित होते.
जिथे शेतकर्याचे हित आणि कल्याण आहे, तिथे मंत्री मुश्रीफ यांनी आम्हाला सदैव पाठबळ दिले. अन्नपूर्णा साखर कारखाना हा केवळ मुश्रीफ यांच्यामुळेच झाला, हे आम्ही जाहीरपणे सांगितल्यानंतर विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे, असा टोला विरोधी उमेदवाराचे नाव न घेता माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी लगावला.