

कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावर सांगली फाटा ते उचगाव या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पिलरच्या पुलासाठी (उड्डाणपूल) 15 मार्चपर्यंत वर्कऑर्डर (काम सुरू करण्याचे आदेश) दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे-बंगळूर महामार्गावरील कागल ते सातारा या मार्गाचे सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. कोल्हापूर शहराला दरवर्षी पुराचा फटका बसतो. 2019 व 2021 साली महापूर आला होता. यावेळी हा महामार्ग बंद झाला होता. पंचगंगा नदीजवळ असणाऱ्या सखल भागामुळे वारंवार पूरस्थिती निर्माण होते. यामुळे सांगली फाटा ते पंचगंगा पूल या दरम्यान सहापदरीकरणात भराव टाकून रस्ता उंच करण्याचा प्रस्ताव होता.
मात्र सध्या भराव टाकल्याने पुराचे पाणी साचून राहते, त्यात आणखी भराव टाकला तर दरवर्षी निम्मे कोल्हापूर शहर पुरात बुडण्याची भीती होती. यामुळे या ठिकाणी भराव न टाकता उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी होती. याबाबत दै. ‘पुढारी’ने आक्रमक भूमिका घेतली. त्यावर तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ही मागणी केली.भराव टाकल्याने होणाऱ्या गंभीर परिणामाची जाणीव होताच तत्काळ हा प्रस्ताव बदलण्यात आला. यानंतर पंचगंगा नदीवर 3.578 किमी लांबीच्या सहा पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर (उड्डाणपूल) बांधकामास मान्यता देण्यात आली. त्याकरिता 913 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली. आता लवकरच कंत्राटदाराला काम सुरू करण्याबाबतचे आदेश दिले जातील, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.