Kolhapur Heavy Rain : उदगावात पाणी आल्याने सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग बंद
उदगांव, पुढारी वृत्तसेवा : सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावरील उदगाव(ता. शिरोळ) येथील टोल नाक्याजवळील कृष्णा नदीच्या पुराचे पाणी आल्याने गुरुवारी (दि.25) रात्री आठच्या सुमारास बायपास महामार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावरील सर्व वाहतूक उदगाव-जयसिंगपूर मधून वळविण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कृष्णा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गुरुवारी (दि.25) रात्री उदगाव येथील टोल नाक्याजवळ बायपास महामार्गावर असलेल्या ओढयाला कृष्णा नदीचे पाणी आल्याने जयसिंगपूर पोलीसांनी गुरुवारी साडेआठच्या सुमारास बायपास महामार्ग बॅरिगेट लावून बंद केला. त्यामुळे सांगली कोल्हापूर महामार्गावरील सर्व वाहतूक उदगाव जयसिंगपूर मार्गे वळविण्यात आली आहे. सन 2021 रोजी आलेल्या महापुरापूर्वी 23 जुलै रोजी ओढ्यावर पाणी येऊन बायपास महामार्ग बंद झाला होता.