कोल्हापूर : अनधिकृत व्यावसायिक बांधकाम व अतिक्रमणामुळे नुकताच रायगडाला मिळालेला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा धोक्यात येऊ शकतो. भविष्यात अशी अपमानास्पद वेळ आली तर यासाठी पूर्णत: रोपवे कंपनी, तिला पाठीशी घालणारे लोक आणि डोळेझाक करणारा पुरातत्त्व विभाग जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला.
गुरुवारी संभाजीराजे यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक यदुबीरसिंह रावत यांना रायगडावरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाबाबतचे निवेदन दिले. तसेच सुरू असणार्या विविध संवर्धन कामांबाबत चर्चा केली.
रोपवे कंपनीकडून गडावर अनधिकृत व्यावसायिक बांधकामे केली आहेत. रायगड विकास प्राधिकरणाने याबाबत पुरातत्त्व विभागाकडे वेळोवेळी आक्षेप नोंदवला आहे. पुरातत्त्व विभागाने काम थांबवण्याची नोटीस देऊनही काम पूर्ण केले गेले आहे. या कंपनीवर कायदेशीर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला. यास पुरातत्त्व विभागाचे महासंचालक व इतर अधिकारी वर्ग कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत. या संभाजीराजे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला महासंचालक सिंह यांनी सहमती दर्शवत केवळ रायगडच नव्हे तर इतर 11 गडांचाही दर्जा काढला जाऊ शकतो, असा धोकाही व्यक्त केला. यावेळी भीमा अजमेरा (संचालक, संवर्धन), सुंदर पॉल (संचालक, संवर्धन) व ए.एम.व्ही.सुब-ह्मण्यम (संचालक, स्मारके) हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.