

कोल्हापूर : एकीकडे लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करून धुमधडाक्यात विवाह, तर दुसरीकडे खर्चाला फाटा देऊन नोंदणी विवाह करणार्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. लग्नातील अनाठायी खर्चाची बचत व्हावी म्हणून काही कुटुंबे सामोपचाराने पाल्यांचे ‘रजिस्टर मॅरेज’ करत आहेत. जिल्ह्यात 2019 पासून 8 मार्च 2025 पर्यंत तब्बल 1772 जोडप्यांनी रेशीम गाठ बांधली आहे. जिल्ह्यात नोंदणी विवाह संकल्पना रुजू लागली आहे.
मैत्रीचे रूपांतर प्रेमात अन् प्रेमाचं रूपांतर थेट लग्नात होताना दिसत आहे. रजिस्टर विवाह नोंदणीसाठी वर किंवा वधू दोघांपैकी एक जण कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. तसेच रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, लायसन्स, बँकेचे ओळखपत्र, चार फोटो आदी कागदपत्रे लागतात. नोटीस दिल्यानंतर 30 ते 90 दिवसांच्या आत विवाह करावा लागतो; अन्यथा नव्याने नोटीस प्राप्त झाल्यावर विवाह करणे, अशी तरतूद आहे.
दोन्ही पक्षकार हे एकत्रित राहणारे नसावेत. दोन्ही पक्षकार यांनी विवाह करण्यासाठी कबुली देणे आवश्यक आहे. तसेच ते मानसिकद़ृष्ट्या सक्षम असणे अधिक महत्त्वाचे असते. त्याचबरोबर तीन साक्षीदार (आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी) नोंदणी विवाहच्या वेळी महत्त्वाचे असतात.