

राधानगरी/ गुडाळ : गेल्या चार दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्राचे वैभव असलेल्या राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज (दि.१६) पहाटे पुन्हा एकदा उघडण्यात आले. या दरवाजांमधून होणाऱ्या विसर्गामुळे भोगावती नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शनिवारी पहाटेच्या शांत वातावरणात प्रथम २ वाजून १६ मिनिटांनी धरणाचा ३ क्रमांकाचा दरवाजा उघडला, आणि त्यानंतर पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी ६ क्रमांकाच्या दरवाजातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला. या अनपेक्षित पण दमदार पुनरागमनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहल आणि प्रशासकीय यंत्रणेत सतर्कता पसरली आहे.
सध्या धरणातून भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. स्वयंचलित दरवाजांमधून २,८५६ क्युसेक्स, वीजगृहातून: १,५०० क्युसेक्स असा एकूण विसर्ग: ४,३५६ क्युसेक्स सुरू आहे. या एकत्रित विसर्गामुळे भोगावती नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली आहे.
धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. गेल्या २४ तासांतील १२५ मि.मी. पाऊस झाला आहे. जूनपासून आतापर्यंतचा एकूण पाऊस ३,९५३ मि.मी. झाला आहे. या आकडेवारीमुळे यंदाचा मान्सून किती सक्रिय राहिला आहे, याचा अंदाज येतो
पंधरा दिवसांपूर्वी पावसाने विश्रांती घेतल्याने धरणाचे दरवाजे बंद झाले होते, ज्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे भोगावती नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून, प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. परतीच्या या पावसाने एका बाजूला चिंता वाढवली असली तरी, दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे.