

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात पावसाची हलकी रिपरिप सुरू आहे. मात्र, धरणक्षेत्रात पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासांत गगनबावडा तालुक्यासह राधानगरी, कुंभी, पाटगाव, घटप्रभा, जांबरे, सर्फनाला, धामणी, कोदे या धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. राधानगरी धरणाचा सहा नंबरचा स्वयंचलित दरवाजा खुला असून, धरणातून एकूण 2928 क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे गुरुवारी दिवसभरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अडीच फुटांची वाढ झाली. शहरात दिवसभर पावसाचा हलका शिडकावा होता. तर ग्रामीण भागात मध्यम पाऊस झाला आहे.
पावासाने पुन्हा जोर धरला आहे. जिल्ह्यात 11.3 मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक 69.4 मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. शहरात रिपरिप सुरू असली तरी धरणक्षेत्रात पवासाचा जोर वाढला. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सकाळी सात वाजता पातळी 19 फूट 9 इंचावर होती. रात्री 9 वाजेपर्यंत यामध्ये दोन फूट सहा इंचाची वाढ होऊन पातळी 22 फूट 3 इंचावर स्थिरावली होती. हवामान विभागाने जिल्ह्याला शुक्रवारी (दि. 29) ऑरेंज अलर्ट दिला आहे.
राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गुरुवारी मध्यरात्री 1.5 वाजता 1, 3, 4, 5 व 6 क्रमांकाच्या एकूण पाच स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरू होता. सकाळी 11.23 वाजेपर्यंत चार दरवाजे बंद झाले असून सध्या 6 नंबरच्या दरवाजातून 1428 व बीओटी पॉवर हाऊसमधून 1500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तसेच दूधगंगा व वारणा धरणातून विसर्गदेखील वाढविला आहे.