

राशिवडे/धामोड : राधानगरी तालुक्यातील मोहडे, राशिवडे खुर्द, शिरगाव, कांबळवाडी, घुडेवाडी, पुंगाव, धामोड, लाडवाडी आणि चांदे येथे पिसाळलेल्या कोल्ह्याने नऊ जणांवर हल्ला करत चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. जखमींवर राशिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर सीपीआरकडे पाठविण्यात आले.
जखमीमध्ये आनंदी बंडोपंत रायकर (वय ६४), अरुण बाजीराव पाटील (४४, दोघे रा. मोहडे), वंदना मधुकर पाटील (४३, रा. पुंगाव), वत्सला विठ्ठल पाटील (६०, रा. राशिवडे खुर्द), धनाजी लहू बरगे (६५), सोनाबाई विठ्ठल परीट (७०), अशोक पांडुरंग पाटील (४९, तिघे रा. शिरगाव), श्रीमती नामदेव सुतार (६२, रा. कांबळवाडी), वासुदेव आनंदा सुतार (४९, रा. घुडेवाडी) या नऊ जणांचा समावेश आहे. दिवसभर जखमी राशिवडे आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी येत होते. अचानकपणे पाय, हात, पाठीवर चावा घेतल्याने नऊजण जखमी झाले. यामध्ये वयोवृध्दांचा समावेश आहे. तसेच धामोड येथील ईश्वरा तुकाराम बोरनाक (८२) आणि लाडवाडी येथील कमल दिनकर कोंडे (५८) जखमी झाले. जखमींनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
बंदोबस्ताची मागणी
सोळांकुर येथील वानराने चावा घेऊन ग्रामस्थांना सक्तीचे लॉकडाऊन घेण्यास भाग पाडल्याची घटना ताजी असतानाच कोल्ह्याच्या हैदोसामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या कोल्ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.