

युवराज पाटील
शिरोली दुमाला : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात करवीर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. गावागावांत बैठका घेऊन आंदोलनाची रणनीती आखली जात आहे. जमीन संपादन प्रक्रियेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
महामार्गासाठी संपादित होणारी सुपीक शेती, पिढ्यान् पिढ्यांचा उदरनिर्वाह आणि येऊ पाहणारी संकटे या मुद्द्यांवरून शेतकरी संतप्त झाले आहेत. अनेक ग्रामसभांमध्ये महामार्गाला विरोध करणारे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सडोली दुमाला, शिरोली दुमाला, गणेशवाडी, कुडित्रे, खुपिरे, साबळेवाडी, वाकरे आदी गावांत बैठका झाल्या आहेत. अजूनही बैठकांचे सत्र सुरू आहे. बैठकीत शक्तिपीठला विरोध तसेच ताकदीने रस्त्यावरच्या लढाईस सज्ज राहण्याचा मनोदय केला जात आहे.
गावात 5 ते 15 गुंठ्यांपर्यंतचे शेतकरी आहेत. त्यांची जमीन गेली तर कुटुंबाने जगायचे कसे? ग्रामसभेत शक्तिपीठविरोधात ठराव केला आहे. वेळ पडल्यास महिलाही रस्त्यावर उतरणार आहेत.
सारिका माने, सरपंच, गणेशवाडी