

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी आपल्या भागाच्या विकासाबरोबर मतदारसंघातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला. बांधकाम व आरोग्य सभापती सरिता नांदेकर यांच्या कार्यालयीन प्रवेशानंतर सदस्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
बांधकाम व आरोग्य सभापती म्हणून सरिता नांदेकर यांची निवड योग्य आहे, असे सांगून आबिटकर म्हणाले, ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ योजना सुरू केली आहे. या सुविधा ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करा.
माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, जिल्हा परिषदेत सध्या महिलाराज आहे. सदस्यांनी वाड्यावस्त्यांवर जाऊन जनतेची सेवा केली पाहिजे. यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, अशोकराव माने, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, नंदकुमार डेंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, राजवर्धन मोहिते, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, के. जी. नांदेकर आदी उपस्थित होते.