कोल्हापूर : राजारामपुरीत अनेक रस्त्यांचे डांबरीकरण झाले असले तरी अत्यंत महत्त्वाचा आणि रहदारीचा असणारा मेन रोड मात्र खड्ड्यांनी माखला आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची तारेवरील कसरत सुरू असून अपघातांचा धोका वाढला आहे. तातडीने खड्डे मुजविण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे.
महाद्वार रोडप्रमाणे आता राजारामपुरीलाही व्यापारी स्वरूप आले आहे. मेन रोडवर ब्रँडेड कपड्यांची शोरूम आहेत. या मार्गावरून वाहतूक वर्दळ मोठी असल्याने हा मार्ग एकेरी केला आहे. या मार्गावरून केएमटी बससेवाही सुरू आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या रस्त्याला डांबर लागले नाही. केवळ पॅचवर्क करून तात्पुरती मलमपट्टी करण्यावर भर दिला जात आहे. गेल्या काही दिवसांत मुरुमाचे पॅचवर्क केले होते. मात्र पुन्हा पाऊस आल्याने दलदल निर्माण झाली आहे.
हनुमान मंदिर ते जनता बझार चौक या मार्गावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहे. आठव्या आणि सातव्या गल्लीत लहान-मोठे एक-दोन खड्डे आहेत. मात्र पाचवी व सहावी या दोन गल्ल्यातील मधल्या भागात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या भागात खड्डे जास्त असल्याने वाहनधारकांना घोडेस्वारी केल्याचा अनुभव येत आहे. अशीच काहीशी स्थिती तिसरी आणि चौथी गल्लीत आहे. तर उत्तरेकडून येताना प्रवेशद्वारातच म्हणजे जनता बझारच्या बाजूला पाणी साचून खड्डे पडले आहेत.