कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत महाद्वार रोड आणि पापाची तिकटी येथे प्रत्येक मंडळास आता केवळ २० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. याकरिता बिनखांबी गणेश मंदिर आणि पापाची तिकटी येथे वेळ दर्शविण्यासाठी सिग्नल यंत्रणाही उभारली जाणार आहे. यामुळे यंदाच्या मिरवणुकीत दरवर्षीपेक्षा जादा मंडळांना मुख्य विसर्जन मार्गावर वेळेत प्रवेश मिळणार आहे.
सोमवारी सायंकाळी सार्वजनिक गणेश मंडळ आणि जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी मिरवणुकीबाबत पोलिस प्रशासनाची ठोस भूमिका मांडली. या निर्णयानुसारच मिरवणूक मार्गावर यंत्रणा कार्यरत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड उपस्थित होते.
महाद्वाररोडवर मोठ्या मंडळांची मक्तेदारी चालणार नाही
विसर्जन मिरवणुकीमध्ये काही मंडळे महाद्वारोडवर दादागिरी करून रेंगाळतात, यामुळे बहुतांशी मंडळांना मुख्य मिरवणुकीत सहभागी होताच येत नाही. अशा १० ते १२ मंडळांची यादी तयार केली असून, त्यांना पोलिस मुख्यालयात बोलावून योग्य ती समज दिली जाणार आहे, असा इशारा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिला.
सोमवारी सायंकाळी सायबर कॉलेजमध्ये प्रशासनाची व सार्वजनिक गणेश मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, प्रांताधिकारी मौसमी चौगुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह महावितरण, अन्न औषध, प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी युवकांचे लक्ष विचलीत करण्याचे काम बाह्यशक्तींकडून सुरू असून, आपली जबाबदारी आता वाढली आहे. प्रशासन आणि मंडळांनी समन्वयाने काम करण्याची गरज असून, नियमांच्या अधिन राहूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी शासन आणि न्यायालयाच्या आदेशांच्या अधिन राहूनच गणेशोत्सव साजरा करावा. प्रशासन मंडळांना योग्य ते सहकार्य करेल. तसेच, ७ दिवसांत मंडळांची अनामत रक्कम परत देण्याच्या सूचनाही दिल्याचे सांगितले. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजवण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. तसेच, कोल्हापूरकरांनी आदर्शवत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
‘त्या’ मंडळांना विशेष दम देणार
मिरवणुकीमध्ये १० ते १२ मोठी मंडळे आपली मक्तेदारी गाजवतात. यामुळे अनेक मंडळांना सहभागी होता येत नाही. अशा मंडळांची यादी तयार केली असून, त्यांना विसर्जन मिरवणुकीपूर्वी चेंबरमध्ये बोलावून योग्य ती समज देण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. याला सर्वच मंडळांनी दाद दिली. तसेच, जिल्ह्यातील सराईत गुंडांना यंदा पुणे, मुंबईतील गणेश दर्शनासाठी पाठवणार असल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला.