

कोल्हापूर : स्थानिकांना विश्वासात घ्या आणि तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या. अंबाबाई आणि जोतिबा देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा त्यांनी गुरुवारी राजर्षी शाहू सभागृहात ऑनलाईन आढावा घेतला.
जिल्हाधिकारी राठोड म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत जी कामे सुरू आहेत, ती अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्णच झाली पाहिजेत. या सुरू असलेल्या कामांमध्ये स्थानिक लोकांना विश्वासात घ्या. जोतिबा मंदिर परिसरात अतिक्रमण आहे का? या ठिकाणी रस्त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे का? याबाबतही त्यांनी बैठकीत विचारणा केली. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव म्हणाले, येत्या 16 मे पासून जनगणनेचे काम सुरू होणार असल्याने, तत्पूर्वी अंबाबाई देवस्थान परिसरातील जागांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. तर प्रशासनाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरातील भूसंपादनाबाबत दोन बैठका झाल्या असल्याची माहिती करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे-चौगुले यांनी दिली.
जिल्हाधिकारी राठोड यांनी तीर्थक्षेत्र आराखड्याच्या सद्यस्थितीचा बारकाईने आढावा घेतला. यासह त्यांनी महापालिकेच्या वतीने यापूर्वीच्या आराखड्यानुसार सुरू असलेल्या कामांचीही माहिती घेतली. कोल्हापुरात आल्यानंतर या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीसाठी पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे हे दूरद़ृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे, महापालिकेचे शहर अभियंता रमेश मस्कर, आर्किटेक्ट रेवा पेठे आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.