

एकनाथ नाईक
कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीवर रिचवलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. हा प्रकार प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस ठरला आहे. शासनाच्या महत्त्वाच्या आणि तांत्रिकद़ृष्ट्या अग्रगण्य विभागाच्या दारातच तळीरामांचा अड्डा असणे ही केवळ लाजिरवाणी बाब नसून संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना आहे.
प्रवेशद्वाराच्या भिंतीवर विविध ब—ँडच्या दारूच्या रिकाम्या बाटल्या पडून आहेत. विशेष म्हणजे या भिंतीला लागूनच सुरक्षा रक्षकांचे कार्यालय असूनही हा प्रकार कुणाच्याच नजरेस कसा पडला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. काही मोठे ठेकेदार, अभियंते आणि विविध कामांसाठी येणारे नागरिक दररोज या प्रवेशद्वारातून ये-जा करतात. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्याआणि तांत्रिकद़ृष्ट्या अग्रगण्य अशा सर्वाजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारावच दारूच्या बाटल्यांचा खच पडून असणे ही अत्यंत घृणास्पद बाब आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारणारा, रस्ते व शासकीय इमारतींची देखभाल करणारा हा विभाग स्वतःच्या कार्यालय परिसराची स्वच्छता राखण्यात अपयशी ठरत आहे, हे संतापजनक आहे.ज्या ठिकाणी रिकाम्या दारूच्या बाटल्याचा खच पडून आहे. त्याला लागूनच सुरक्षा रक्षकांचे कार्यालय आहे हे विशेष.
अधिकारी, कर्मचारी नियमित या प्रवेशद्वारातून ये- जा करत असतात, पण त्या रिकाम्या झालेल्या दारूच्या बाटल्या दिसत नाहीत का? की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा संतप्त सवाल येथे कामानिमित्त येणार्या नागरिकांमधून उपस्थित होत आहे. जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय केंद्र असलेल्या या इमारतीच्या प्रवेशद्वारावरच अशी परिस्थिती असणे ही शासनाच्या प्रतिमेला काळिमा फासणार आहे.
तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी
सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व अन्य लोकप्रतिनिधी यांनी या गंभीर प्रकाराची तत्काळ दखल घेऊन संबंधित अधिकार्यांची चौकशी करावी. जबाबदार घटकावर कारवाई करावी. तरच अशा प्रकारांना आळा बसेल, असे येथे ये-जा करणार्या नागरिकांनी सांगितले.
सीसीटीव्हीचा उपयोग काय
शासकीय कार्यालयात अनुचित प्रकार घडू नये. तसेच अन्य घटकांवर लक्ष राहावे यासाठी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासह परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. असे असताना सार्वजनिक बांधकाम भवनच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आल्या कोठून. याचा शोध प्रशासन घेणार का ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.