कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नदी-धरणांमध्ये पुन्हा जीव आला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी अवघ्या २१ तासांत दीड फुटाने वाढून १३ फूट ६ इंचांवर पोहोचली आहे. परिणामी, इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला.
दरम्यान, गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ५५.३ मि.मी. पाऊस झाला, तर कासारी, पाटगाव, घटप्रभा आणि कोदे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रविवार (दि. ५) पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ कायम ठेवला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली
कोल्हापूर : कोल्हापूर शहर परिसरासह धरण क्षेत्रांत कोसळत असलेल्या पावसामुळे नदीतील पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. गुरुवारी रात्री पंचगंगेची राजाराम बंधारा येथे पाणी पातळी १३ फूट ६ इंच होती. तथापि, काळम्मावाडी व राधानगरी धरणांत अपेक्षित पाणीसाठा होत नाही आणि जलसपंदा विभागाकडून तसे कळविले जात नाही तोपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा राहणार आहे. काळम्मावाडी धरणात पाणी नसल्याने थेट पाईपलाईन योजना बंद पडली. सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.