

कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) मध्यवर्ती बस स्थानकामध्ये एस.टी. बसचे आगार आहे. येथील वर्कशॉपमध्ये बस धुतल्या जातात. त्याचे सांडपाणी परीख पुलाच्या दिशेने येते. येथील बंद असणारा एसटीपी तत्काळ सुरू करावा, अशी नोटीस बजावली असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.
तसेच रेल्वे स्टेशन प्रशासनालाही तत्काळ एसटीपीचे काम पूर्ण करून सांडपाणी प्रक्रिया करूनच सोडण्याची नोटीस दिली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदूषणासंदर्भात बैठक झाली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मध्यवर्ती बसस्थानकाच्या वर्कशॉपमध्ये रोज 30 ते 40 बस धुतल्या जातात. याचे सांडपाणी गटारीमधून सोडले जाते. हे पाणी परीख पुलाच्या दिशेने जाते. त्यामुळे परीख पुलाजवळ सांडपाणी साठते. एसटीचा एसटीपी होता; परंतु काही दिवसांपासून तो बंद आहे. त्यामुळे येथील सांडपाणी परीख पूल येथे येत असल्याची माहिती ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणली.
यासंदर्भात एस.टी. विभागाला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प त्वरित सुरू करण्याची नोटीस बजावल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वेच्या बोगी धुण्याचे काम चालते. या सांडपाण्यावरही प्रक्रिया होत नाही. हे पाणी गटारीमधून जयंती नाल्यात येते. त्यांनाही एसटीपी उभारून सांडपाण्याचा पुर्नवापर करावा, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले आहे.