

Wildlife Human Conflict on Human Protection Law
बांबवडे : संसदेत खासदार धैर्यशील माने यांनी वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मानव संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली अभयारण्यामुळे शिराळा व शाहूवाडी तालुक्यांमध्ये वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
विशेषतः गवे आणि बिबटे यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याने पाळीव जनावरे तसेच माणसांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले. वन्यजीव संरक्षणासाठी जसा कायदा आहे, त्याच धर्तीवर मानवाच्या सुरक्षिततेसाठी कायदा असावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी ते म्हणाले की, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चांदोली अभयारण्य असून त्याच्या आसपास शिराळा आणि शाहूवाडी हे तालुके आहेत. या भागात गवे आणि बिबट्यांचा वावर वाढून ते वारंवार हल्ले करत आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे विशेषतः लहान मुले आणि शेतात काम करणारे नागरिक धोक्यात आले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले असून पालकांना मुलांना घराबाहेर सोडणेही धोकादायक वाटू लागले आहे.
या हल्ल्यांमध्ये अनेकांनी जीव गमावला असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच वन्य प्राण्यांविरोधात संतापही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थिती आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन, वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणेच मानवाचे रक्षण करणारा कायदा तयार करून तो तातडीने अंमलात आणावा, अशी मागणी खासदार माने यांनी केंद्र सरकारकडे केली.