

आशिष शिंदे
कोल्हापूर : एक मच्छर माणसाला ताप, डोकेदुखी आणि हजारो रुपयांचे रुग्णालयाचे बिल देऊन जाऊ शकतो. पावसाळा सुरू असल्याने डासांची घुई घुई सर्वत्र सुरू आहे. अशातच महाराष्ट्रातील डासजन्य आजारांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत चार वर्षांत तब्बल ६५ टक्क्यांनी वाढ झाली असून रुग्णसंख्या दीड लाखांपर्यंत पोहोचली. २०२२ मध्ये या तीन आजारांचे मिळून २५ हजार ११६ रुग्ण होते. ही रुग्णसंख्या २०२५ मध्ये वाढून ४१ हजार ४३३ झाली.
म्हणजेच चार वर्षांत तब्बल १६ हजार ३१७ रुग्णांची वाढ झाली आहे. २०२६ मध्येही डासजन्य आजारांची स्थिती चिंताजनकच आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार २०२६ मध्ये आतापर्यंत राज्यात मलेरियाचे जूनपर्यंत ५,२१४ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे एप्रिल (२०२६) पर्यंत १५२५ तर चिकुनगुनियाचे (२०२६) पर्यंत ३८७ रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. ही केवळ आकडेवारी नाही तर सार्वजनिक आरोग्यावर ओढावलेले संकट आहे.
चिकुनगुनिया रुग्णसंख्या
चार वर्षांत तिप्पट
डेंग्यू : +६५%
मलेरिया : +५४%
चिकुनगुनिया : +२१७%
२०२६ ची स्थिती अशी
डेंग्यू :1,525 (30 एप्रिलपर्यंत)
चिकुनगुनिया :387 (30 एप्रिलपर्यंत)
मलेरिया :5,214 (जूनपर्यंत)