आशिष शिंदे
कोल्हापूर : यंदा कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस कोल्हापुरात वरुणराजाचे आगमन होणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. मान्सूनचे आगमन जरी लवकर होणार असले, तरी यंदाचा पावसाळा हा एल निनो आणि पॉझिटिव्ह आयओडी यांच्यातील संघर्षामुळे इतर वर्षांच्या तुलनेत लहरी राहणार आहे. जून-जुलैपासून ‘एल निनो’चा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी राहू शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सुरुवातीला मान्सूनचा वेग समाधानकारक असला, तरी 8 जून रोजी पुणे आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर मान्सूनची प्रगती सुमारे 20 जूनपर्यंत थंडावण्याची चिन्हे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पॅसिफिक महासागरातील एल निनोमुळे जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, हिंदी महासागरातील ‘पॉझिटिव्ह आयओडी’ या स्थितीमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाला पुन्हा जोर मिळू शकतो. एकूण पावसाचे प्रमाण सरासरीच्या 92 ते 96 टक्क्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
1. ‘ब्रेक आणि बर्स्ट’ पॅटर्नमुळे जूनमध्ये समाधानकारक, जुलैमध्ये मोठ्या खंडाची शक्यता
2. एल निनोमुळे पावसावर दबाव; पॉझिटिव्ह आयओडीमुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुधारणा
3. राज्यात पाऊस सरासरीच्या 92 ते 96 टक्क्यांदरम्यान राहण्याचा अंदाज
4. कोल्हापुरात ‘हायपरलोकल’ पावसाचा अंदाज; घाटमाथा आणि शहरात मोठी तफावत संभव
5. एल निनो म्हणजे पॅसिफिक महासागरातील तापमान वाढण्याची स्थिती भारतातील मान्सून करते कमकुवत
6. पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल हा हिंदी महासागरातील तापमानातील अनुकूल बदल पावसाला आधार देतो
तिबेट आणि हिमालय परिसरातील कमी हिमाच्छादनामुळे मान्सूनच्या प्रारंभिक प्रगतीला पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. एल निनो आणि पॉझिटिव्ह आयओडी या दोन विरोधी हवामान घटकांच्या प्रभावामुळे यंदाचा मान्सून अत्यंत अस्थिर राहू शकतो.
माणिकराव खुळे