

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या ‘मिशन उत्कर्ष’ उपक्रमाला यश मिळाले असून, भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद देशात द्वितीय, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर अग्रक्रम कायम राखत जिल्ह्याने शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चांक कायम ठेवला आहे.
यासंदर्भातील माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती शीतल यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सादरीकरणाद्वारे यशामागील नियोजन व अंमलबजावणीची माहिती दिली.
भारत सरकारकडून शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी पीजीआय निर्देशांक तयार केला जातो. यामध्ये यू-डायस प्लस, राष्ट्रीय संपादन चाचण्या तसेच विविध शैक्षणिक निकषांसह ७० निर्देशकांवर एकूण ६०० गुणांचे मूल्यमापन केले जाते. या गुणांकनाच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांची तसेच देशातील स्थान निश्चित केले जाते. सन २०२४-२५ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेला ४६३ गुण मिळाले होते आणि देशात प्रथम क्रमांक मिळाला होता. यंदा २०२५-२६ मध्ये ४६१ गुणांसह देशात द्वितीय, तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखली आहे.
रणनीती ठरली यशस्वी
‘मिशन उत्कर्ष’ अंतर्गत स्वतंत्र दिनदर्शिका तयार करून कालबद्ध नियोजन करण्यात आले. जिल्हास्तरावर नियमित आढावा घेण्यात आला, तर यू-डायस प्लस प्रणालीमध्ये अचूक माहिती भरण्यासाठी तालुकास्तरीय कक्ष स्थापनकरण्यात आले. या उपाययोजनांमुळे जिल्ह्याच्या गुणांकनात सातत्य राखणे शक्य झाल्याचे शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले.