

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोन टॅपींग प्रकरणी पोलिस चौकशी सुरू आहे. यावर राज्यात भाजपकडून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. यावर राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत भाष्य केले. ते म्हणाले की, फोन टॅप प्रकरणी विरोधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलिस केवळ माहिती घेत आहेत त्यासाठी एवढा गोंधळ कशाला करत आहात. साधी चौकशी सुरू आहे यामुळे मोठे आकाश कोसळणार आहे का? असा सवाल भुजबळ यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीमधील कित्येक नेत्यांवर सीबीआय, ईडी सारख्या संस्थांचा पुरेपूर वापर करत कारवाया केल्या जात आहेत. त्याविषयी काही बोलता भाजपमधील कोणीही बोलताना दिसत नाही. हे सरकार पाच वर्षे पूर्णपणे टिकेल. शरद पवार सोनीया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारच्या बाजूने ठाम आहेत. काहीही झाले तरी हे सरकार कोसळणार नाही. तसेच गोव्यात भाजप विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढले असते तर तर चित्र वेगळे असते, असेही ते म्हणाले,